पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'शालेय वयातच विद्यार्थ्यांना निसर्गाचे शिक्षण दिले पाहिजे,' असे प्रतिपादन निसर्ग अभ्यासक रघुनंदन कुलकर्णी यांनी केले. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन शारदा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यात भारतीय जैवविविधता आणि माणूस या विषयावर कुलकर्णी बोलत होते.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव आदी उपस्थित होते. कुलकर्णी पुढे म्हणाले, 'निसर्गात गेल्यावर आपल्याला विज्ञान शाप की वरदान याचा प्रश्न पडतो. विज्ञानाने प्रगती होते, परंतु त्याच्या जिवावर किंवा कोणाचा जीव घेऊन आपण प्रगती करतो, याचा विचार झाला पाहिजे.'
प्रास्ताविकात संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम म्हणाले, की माणूस निसर्गावर अतिक्रमण करतोय, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट जगावर आले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि जोपासना करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी संस्थेच्या वतीने विद्यार्थी, शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध, वक्तृत्व, ई- पोस्टर, ई – कन्टेट, शुभेच्छा पत्र, रोबोटिक मेकिंग, प्रश्नमंजूषा आदी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. वाघिरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी आभार मानले. पिरंगुट विद्यालयाच्या उपशिक्षिका अमृता खराडे यांनी सूत्रसंचालन केले.