पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा कचरा डेपो असलेली उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांमध्ये आता स्वतंत्र नगरपालिका स्थापन होणार असली, तरी महापालिकेचा कचरा डेपो याच ठिकाणी कायम राहणार आहे. कचरा डेपोचे सर्व्हे नंबर असलेला भाग महापालिकेतच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या ठिकाणी 1992 पासून महापालिकेचा कचरा डेपो आहे. ही गावे महापालिकेत नसतानाही पालिकेचा कचरा या ठिकाणी टाकला जात होता.
मात्र, येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या विरोधात सातत्याने आंदोलने उभी केल्यानंतर अखेर उघड्यावर कचरा टाकणे बंद करण्यात आले असून, आता या ठिकांणी कचर्यावरील प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, ही दोन्ही गावे वगळण्याचा निर्णय झाल्यानंतर येथील कचरा डेपोमधील प्रकल्पांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महापालिकेचा कचरा डेपोचे सर्व्हे नंबर पालिकेच्या हद्दीतच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. तर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही आम्ही महापालिकेचा कचरा अडविणार नसल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
टीपी स्कीम महापालिकाच करणार
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या तीन नगररचना योजना (टीपी स्कीम) महापालिकेकडून होण्याची शक्यता आहे. नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार या प्रस्तावित टीपी स्किम करण्यासाठी महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडून केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्या कर्मचार्यांनाही जावे लागणार नगरपालिकेत
कचरा प्रकल्पामुळे ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने करून आजवर अनेक मागण्या महापालिकेकडून मान्य करून घेतल्या आहेत. यामध्ये गावातील नागरिकांना महापालिकेत नोकरीस देणे, जास्तीचे पाण्याचे टँकर अशी कामे करण्यात आली आहेत. महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारीही महापालिकेत वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, आता ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात येणार असल्याने महापालिकेत नोकरी दिलेल्या कर्मचार्यांनाही नगरपालिकेमध्ये वर्ग करावे लागणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, शासन निर्णय आल्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.