

पुणे: महापालिकेच्या निवडणुका लढविताना तेथील स्थानिक घटकांचा विचार करून वेगवेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. हे करताना महायुतीच्या ऐक्याला तडा जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. येणार्या महापालिकांच्या निवडणुका प्रत्येक पक्ष गरजेनुसार स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकाराशी संवाद साधताना तटकरे बोलत होते. (Latest Pune News)
सुनील तटकरे म्हणाले की, राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची सत्ता आहे. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढविल्या. या निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवून केंद्रात व राज्यात महायुतीच्या पदरात मोठे यश टाकले.
चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने निवडणुकीची तयारी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात आल्या असल्या, तरी महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका गरजेनुसार स्वबळावर लढण्याचा विचार आहे.
निवडणुकीसाठी महायुतीची समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. यात तीनही पक्षांच्या नेतेमंडळींचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीबाबत योग्य चर्चा करून महायुतीबाबत निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी एकच निर्णय होईल असे नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय घेताना महायुतीच्या ऐक्याला कुठेही तडा जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचे अध्यक्ष दोन्ही ठाकरे आहेत. ते दोघे एकत्र येतात की नाही, हे पांडुरंगालाच माहीत, अशी टिप्पणीही तटकरे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मिळाला नाही
राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष एकत्रित येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही. ही केवळ चर्चा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. हा सामूहिक निर्णय होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून सामोरे गेलो आणि राज्यातील मतदारांनी अजितदादांना बहुमत देत त्यांच्या बाजूने कौल दिला. ज्यांना अजित पवार यांची भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका पटत आहे, ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. येणार्या काळातही मोठ्या संख्येने प्रवेश होतील.