

मंचर: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ टँकर उलटल्याने वाहतूककोंडीत अडकलेल्या 286 प्रवाशांनी रेल्वे, ओला करून मुंबई विमानतळ गाठले. चेक इन झाल्यानंतर केवळ दहा मिनिटे प्रवाशांना विलंब झाला. तोपर्यंत इंडिगो कंपनीच्या विमानाने उड्डाण केल्याने प्रवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत प्रवाशांनी तीव संताप व्यक्त केला.
या प्रवाशांनी 4 फेबुवारी रोजी पहाटे 5.25 वाजताच्या मुंबई-अबुधाबी विमानाची तिकिटे काढली होती. त्यासाठी पुण्याहून दि. 3 रोजी सायंकाळी पाच वाजता 50 प्रवाशांचा गट मुंबईकडे निघाला. तसेच, इतर 236 प्रवासी बसने मुंबईकडे निघाले. लोणावळ्याजवळ टँकर उलटल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. त्यात प्रवासी अडकले.
परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांनी खंडाळ्याहून यू-टर्न घेत लोणावळा रेल्वे स्थानक गाठले. तेथून मध्यरात्री 12.40 च्या कोणार्क एक्सप्रेसची तिकिटे काढून प्रवास सुरू केला. परंतु, ही गाडीही सुमारे एक तास उशिराने धावली. वेळ वाचवण्यासाठी प्रवासी दादरऐवजी ठाणे स्थानकावर उतरले. ओला सेवेद्वारे एक हजार रुपये मोजून प्रवाशांनी धावपळ करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले.
मात्र, चेक इन होईपर्यंत विमान उड्डाणाची वेळ झाली. केवळ दहा मिनिटांच्या विलंबामुळे जवळपास 286 प्रवासी विमानात चढू शकले नाहीत. अवघे पन्नास प्रवासी घेऊन विमान उडाले. यामुळे प्रवाशांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. शारीरिक-मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. वारंवार विनंती करूनही विमान कंपनीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. विमानतळातून बाहेर निघताना तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी आमची चौकशी करत आरोपींसारखी वागणूक दिल्याचा आरोप गिरवली(ता. आंबेगाव) येथील जुई पवन हगवणे आणि प्रवाशांनी केला. याबाबत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
लोणावळ्यात 32 तास अडकलो, रेल्वे-ओला करून विमानतळ गाठले; पण फक्त दहा मिनिटांसाठी विमान न थांबवता निघाले. आमचे लाखोंचे नुकसान झाले. इतका प्रवास करूनही कुणी मदत केली नाही, विमान कंपनीने आमच्यावर अन्याय केला.
जुई पवन हगवणे, संचालिका सावली टूर्स