तळेगाव दाभाडे : एकीकडे अमेरिका, चीन, कॅलिफोर्निया या देशात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधन आणि निर्मिती प्रचंड वेगाने पुढे जात आहे. मात्र, राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे येथे अशा प्रगतउद्योग कंपन्या येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील उद्योग व्यवसायातील पहिल्या क्रमांकाचे राज्य राहिले नाही. आंतरराष्ट्रीय उद्योग जगताच्या खाती आता मुंबईदेखील देशाची आर्थिक राजधानी राहिलेली नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (दि. 3) तळेगाव दाभाडे येथील व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले.
येथील कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत ते 'कृत्रिम बुध्दीमत्ता' याविषयावर पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी त्रिदल पुणे संस्थेचे अध्यक्ष तथा विचारवंत डॉ. सतीश देसाई होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष तथा भारतरत्न जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्कार विजेते रामदास काकडे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार
करण्यात आला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या आर्टिफिशियल इन्टॅलिजन्स, मशिन इन्टॅलिजन्समधील संशोधनाचा वेग आणि व्याप्तीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे विपरित परिणाम राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर झाले असल्याचा आरोप करून ते पुढे म्हणाले, कोणी काहीही समजो, महाराष्ट्र हे देशातील उद्योग व्यवसायातील पहिल्या क्रमांकाचे राज्य राहिले नाही. आंतरराष्ट्रीय उद्योगजगत आता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहिलेली नाही, हे वास्तव आहे. राज्यातील राजकीय अस्थिरता आणि केंद्र सरकारची बघ्याची भूमिका हे त्यामागचे मूळ कारण आहे.
देशातील एकूण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि उद्योगव्यवसाय आणि रोजगार याबाबत उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की सेमिकंडक्टर निर्मितीवर या आधुनिक तंत्रज्ञानाची मदार असल्याने परकीय उद्योग भारतात स्थापित व्हावेत, म्हणून केंद्र सरकारच्या 20 हजार कोटींच्या मदतीसह मोफत जमीन, पाणी, वीज आदी सवलती देण्याच्या योजनेनंतरही भारतात कोणीही गुंतवणूकदार यायला तयार नाही.
हे तंत्रज्ञान आपल्याला विकत घ्यावे लागणार आहे. त्याचा प्रचंड वेग आणि व्याप्ती पाहाता, येणार्या काळात देशातील रोजगार आणि नोकर्या नष्ट होतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. युद्धसामग्री तंत्रज्ञानात चीन, रशिया आणि अमेरिकेत तेथील भाषिक आर्टिफिशियल इंटॅलिजंसवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. या जीवघेण्या स्पर्धेत केंद्र सरकारने जर नुसतीच बघ्याची भूमिका घेतली, तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षितता देखील धोक्यात जाईल.
शिक्षणाचा दर्जा वाढेल, परंतु शिक्षित रोजगारांवर गंडांतर येईल. वैद्यकीय, कायदा, कला, औषधी निर्माण, आर्किटेक्ट अशा अनेक कुशल, अनुभवी लोकांवर संकट येऊ घातले आहे. हे तंत्रज्ञान जितके नवनिर्मितीजन्य आहे तितकेच ते धोकादायकही आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी या बदलांशी समरस होत चांगले काम करण्यासाठी प्रत्येकाने विचार करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा