मोशी, पुढारी वृत्तसेवा: येथील पुणे-नाशिक महामार्गावर दुभाजकाभोवती साचलेली माती हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुभाजकाची उंची घटली असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्गाच्या सुरक्षतेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली ओ. या रस्त्यावर टोल वसुली सध्या बंद आहे. महामार्ग प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या पावसात रस्त्यावरील गाळ दुभाजकाच्याकडेला साचला असून, यामुळे दुभाजकाची अगोदरच कमी असलेली उंची अधिकच घडली आहे.
त्यामुळे दुभाजकाला त्रिकोण आकार तयार झाला असून यावरून एखादे वाहन सहज चढेल अशी परस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे गाळ सुखला असून माती रस्त्यावर पसरत आहे. यामुळे वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने ही माती तात्काळ हटवावी, अशी मागणी होत आहे. एकीकडे लवकरच वाहनांकडून टोल वसुली पुन्हा सुरू होणार असताना दुसरीकडे सुविधा पुरविताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.