वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : तोरणा-राजगड खोर्यासह वेल्हे तालुक्यातील बहुतांश बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. परिणामी, जिल्हा परिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका अतिदुर्गम वेल्हे तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील शेतकर्यांना बसला आहे.
तोरणा, राजगड भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात नदी, नाले तुडुंब भरून वाहतात. ओढे, नाले, नदीवरील बंधार्यात प्लेट बसवून पाणी अडवले जाते. त्याचे फोटो काढून बिले काढली जातात. पावसाळा संपताच नदी, नाल्यातील पाणी कमी होताच बंधारे कोरडे पडतात. बहुतेक बंधारे निकृष्ट असल्याने पाणी गळती होते. त्यामुळे पावसाळा संपताना शेवटच्या काळात पाणी अडवण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
तोरणा भागातील वरोती बंधार्यात पाणी न अडवल्याने तो कोरडा पडला आहे. या बंधार्यावरून दुर्गम कुसारपेठ, वरोती खेड्यातील विद्यार्थ्यांसह नागरिक धोकादायक प्रवास करतात. बंधार्याची उंची सहा मीटर असून, रुंदी कमी आहे. पासली बंधाराही गळतीमुळे कोरडा पडला आहे. या बंधार्यावरून माझगाव येथील मुलांची ये-जा सुरू आहे. वेळवंडी नदीचा एक उगम पासली व दुसरा केळद खोर्यात आहे. या दोन्ही खोर्यात 12 बंधारे आहेत. तसेच राजगड गुंजवणी, कानद नदीवर बंधारे आहेत.
याबाबत छोटे पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या आहेत. बंधार्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांची कार्यवाही करण्यात येईल.
पंकज शेळके, गटविकास अधिकारी, वेल्हे पंचायत समिती.या भागात अतिवृष्टीमुळे नद्या, ओढे नाल्यांचे पाणी वाहून जाते. बंधार्यात पाणी अडवण्याचे काम ऑक्टोबरमध्ये केल्यास पाणी अडवण्याचा खर्च वाया जाणार नाही. बंधार्यातील गळती समोर येऊन त्यावर उपाययोजना करता येईल.
रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद.
90 टक्के बंधार्यांना गळती
कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणीगळतीमुळे शेती, जनावरे, माणसांना बंधार्याचा उपयोग होत नाही. अशी स्थिती राजगड तोरणासह तालुक्यातील 90 टक्के बंधार्यांची आहे. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. निकृष्ट दर्जाच्या बंधार्याची साधी पाहणीही प्रशासन करत नाही. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडणार्या तालुक्यातील शेतकरी रब्बी पिकांपासून वंचित आहेत.