

कोंढवा: महंमदवाडी परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केबल बिघाड, महापालिकेच्या कामामुळे केबल तुटणे, तांत्रिक अडचणी अशी विविध कारणे देत महावितरणकडून वीजपुरवठा वारंवार बंद केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सततच्या व्यत्ययाचा फटका नागरिकांसह लघुउद्योग, व्यावसायिक आणि वारकरी भाविकांनाही बसला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अनेकदा तासन्तास, तर काही वेळा दिवसभर वीजपुरवठा खंडित राहतो. तक्रारी करूनही त्वरित दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. केबल दुरुस्तीसाठी किंवा जॉइंट जोडण्यासाठी तब्बल १२ ते १४ तास लागतात, असा आरोपही नागरिकांनी केला.
वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे लहान-मोठ्या उद्योगांचे कामकाज विस्कळीत होत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पाऊस, वादळी वारे किंवा नैसर्गिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होणे समजू शकते; मात्र, वातावरण सुरळीत असतानाही रोजच तांत्रिक कारणांमुळे वीज जाणे हे महावितरणच्या नियोजनातील त्रुटी दर्शवित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरणच्या कारभारत प्रकाश पडणार तरी कधी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास महावितरणविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. महावितरणने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वारकऱ्यांची झाली होती गैरसोय
आषाढी वारीदरम्यान महंमदवाडीत मुक्कामी असलेल्या वारकरी भाविकांनाही या समस्येचा सामना करावा लागला. वीज नसल्यामुळे त्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करावे लागले, तर भजन-कीर्तनही अंधारातच करावे लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.