नसरापूर: राजगड तालुक्यातील पाणी बारामतीसाठी चालते. मात्र, येथील दयनीय अवस्था पालकमंत्री अजित पवार यांना दिसत नाही का? खासदार सुप्रिया सुळे या हिंजवडीला आंदोलन करणार आहेत.
अजित पवार आणि सुळे यांना राजगड दिसत नाही का? असा सवाल करत पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे अधिकार्यावर अंकुश नसल्याने चेलाडी ते वेल्हे या मार्गाची चाळण झाली आहे. या निषेधार्थ वेळोवेळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिला आहे. (Latest Pune News)
केळवडे (ता. भोर) येथे भोर, राजगड तालुक्यातील मनसे पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी (दि. 31) ऑगस्ट रोजी वृक्षारोपण आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष विलास बोरगे, राजगड तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, मुळशी तालुकाध्यक्ष धनंजय टेमघरे, भोर शहराध्यक्ष शशिकांत वाघ, अशोक चोरघे, संतोष चोरघे, मिथुन चोरघे, संग्राम दसवडकर, पांडुरंग पिलाने उपस्थित होते.
संतोष दसवडकर म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी मार्गासनी येथे खड्ड्यात अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शासनाच्या बेफिकिरीचे ठळक उदाहरण आहे.
नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत, अपघात वाढत आहेत, पण जबाबदार प्रशासन गप्प बसले आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तर हा लढा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. शासनाला जागे करण्यासाठी व नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या आंदोलनाला उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी, असे आवाहन विलास बोरगे, दिगंबर चोरघे, धनंजय टेमघरे यांनी केले.