पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'राज्यात अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना आवश्यक ती मदत योग्य वेळी करण्यासाठी सहकार साहाय्यता निधी उभारण्याची गरज आहे,' असे मत राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. लवकरच नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात व्यापक बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात नुकतीच सावे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर व बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने पुढाकार घेऊन मुंबई जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनाही या बैठकीसाठी आमंत्रित केले होते.
अनास्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करून राज्य बँकेच्या गेल्या चार वर्षांतील कामकाजाच्या आढाव्याचे सादरीकरण या वेळी केले.
डॉ. कराड यांनी नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी व रिझर्व्ह बँकेच्या संबंधित अधिकार्यांबरोबर एक बैठक घेऊन त्यामध्ये सविस्तर चर्चेद्वारे नागरी सहकारी बँकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या रिझर्व्ह बँकेकडून असलेल्या अपेक्षा मांडताना दरेकर यांनी रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँकांना देत असलेल्या सापत्न वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भोईर यांनी नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही मंत्र्यांना संस्थेच्या वतीने निवेदन दिले.