

नारायणगाव: कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातील पाणीसाठा 7 टक्क्यांवर आला आहे. परिणामी परिसरात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कुकडी प्रकल्पात एकूण सुमारे 21 टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी माणिकडोह धरणातील साठा 7 टक्क्यांवर आला आहे. या स्थितीमुळे आगामी काळात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील का, अशी भीती शेतकऱ्यांसह जुन्नर शहरवासीयांत आहे. सध्या प्रचंड उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून, उपलब्ध साठ्यात झपाट्याने घट होत आहे. मे, जून आणि जुलै महिन्यात पाऊस कधी पडेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. यंदा पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत असल्याने परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
उर्वरित पाणी आता खाली सोडले जाणार नाही. हे पाणी जुन्नर शहरवासीयांना व परिसरातील गावातील नागरिकांना पिण्यासाठी राखून ठेवले जाणार आहे. पाऊस पडेपर्यंत या धरणातील पाणी पुरेल असे नियोजन आम्ही केले आहे. पाऊस उशिरा झाला तर काही प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते.
गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग