पुणे; पुढारी वृत्तसेवा : वनखात्याच्या ताब्यातील गायरान जमिनीवर बेकायदेशीररीत्या कचरा टाकला आणि पेटवून दिला. याप्रकरणात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने माण ग्रामपंचायतीला 34 लाखांचा दंड ठोठावला. तसेच, या ठिकाणी कचरा टाकण्यास आणि जाळण्यास मनाई केल्याचा निकाल न्या. दिनेशकुमार सिंग, तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिला. तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर खंडपीठाने हा आदेश दिला.
राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी फेज-3 जवळील क्लिफ गार्डन सोसायटीने ग्रामपंचायतीच्या अवैध कचरा डम्पिंग विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात धाव घेतली होती. अॅड. सौरभ कुलकर्णी यांनी क्लिफ गार्डन सोसायटी व रहिवाशांची बाजू मांडली. या कचर्यामुळे कित्येक वर्षे लगतच्या रहिवाशांना आणि सोसायट्यांना त्रास होत होता.
कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराच्या लोटांना सामोरे जावे लागत होते. ग्रामपंचायतीला या कामासाठी लागणारी जागा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरवायची आहे. तोपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दरमहा 1 लाख रुपये दंड जमा करायचा असल्याचे आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष गोकुल ओझा यांनी दिली.