

पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडीसी) माध्यमातून मिश्र खतांचे उत्पादन वाढल्याने आगामी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खतांचा चांगला पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
'एमएआयडीसी'च्या कोल्हापूर येथील मिश्र खत कारखान्यातील दुसऱ्या उत्पादन सत्राचा शुभारंभ कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने गुरुवारी (दि. २७) करण्यात आला. या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
महामंडळाच्या कोल्हापूर येथील मिश्र खत कारखान्यात उत्पादित होणाऱ्या मिश्र खताचा पुरवठा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच धाराशिव व पुणे जिल्ह्यांमध्ये केला जातो. कृषी उद्योग मिश्र खतांना शेतकऱ्यांची पसंती असून, बाजारातील इतर खतांच्या तुलनेत या मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
सध्या कारखान्यात एका सत्रामध्ये मिश्र खताचे उत्पादन सुरू असून दररोज सुमारे ४० मेट्रिक टन उत्पादन होते. कारखान्याची मंजूर वार्षिक उत्पादन क्षमता १६ हजार मेट्रिक टन आहे. खरीप व येणाऱ्या रब्बी हंगामातील वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खतांचा सुरळीत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने दुसरे उत्पादन सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सुमारे ४० मेट्रिक टन अतिरिक्त उत्पादन होऊन कारखान्याच्या वार्षिक उत्पादन क्षमतेनुसार उत्पादन घेणे शक्य होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.