

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यात येईल, असे आश्वासन परिषदेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे प्रमुख योगेश सोमण यांनी मंगळवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिले.
परिषदेच्या शाखा अधिक सक्षम करणे, शाखांना दरवर्षी अर्थसाह्य देऊन त्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करणे, शाखांमार्फत युवा लेखकांसाठी लेखन कार्यशाळा, संवादसत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य सरकारची मान्यता मिळवून देणे, मसापच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळविण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे, असा साहित्य संवर्धन आघाडीचा वीस कलमी जाहीरनामाही या वेळी प्रसिद्ध करण्यात आला.
मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाहपदाच्या उमेदवार स्वाती महाळंक, कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर, कार्यवाहपदाचे उमेदवार सुनील महाजन यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालविण्यात येईल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस आणि कृतिशील कार्यक्रम राबविण्याचा निर्धारही जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, सभासदांना अल्प शुल्कात सभागृह, साहित्यपत्रिकेची छपाई, अमराठी नागरिकांमध्ये मराठीप्रती आस्था निर्माण करणे, साहित्यिक उपक्रम तसेच विविध ठिकाणच्या लेखकांना बळ देणे, अशा विविध मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात केला आहे.
साहित्य संवर्धन आघाडीकडून प्रतिस्पर्धी पॅनेलच्या आरोपांचे खंडन
साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप केला जात आहे. या परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता आम्ही निवडणूक लढवून कायदेशीर पद्धतीने संस्था चालविणार आहोत. आमचे साहित्य संवर्धन आघाडी हे समविचारी, साहित्यप्रेमी, साहित्यिक आणि साहित्यविषयक काम करणाऱ्या एकविचारी मंडळींचे पॅनेल आहे. साहित्य संवर्धन आघाडी हे पॅनेल रा. स्व. संघाचे नाही. संघ असे पॅनेल करून कधी निवडणुकीत उतरत नाही. संघ कोणत्याही निवडणुकीला पुरस्कृत करीत नाही, अशा शब्दांत साहित्य संवर्धन आघाडीने प्रतिस्पर्धी पॅनेलच्या आरोपांचे खंडन केले आहे. काही मंडळींच्या एका पुस्तकात पहिले छायाचित्र मुख्यमंत्र्यांचे आहे. मग, कोण मुख्यमंत्र्यांचा वापर करीत आहे? हे कळेल, याकडेही पॅनेलने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण यांनी, आमच्यासाठी साहित्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ-नवोदित साहित्यिक आणि समस्त वाचकवर्ग काम करीत आहे, असे सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक 2026-2031 च्या घोषित कार्यक्रमानुसार गुरुवारपासून (दि. 5 फेबुवारी) मतपत्रिका मसापच्या नोंदणीकृत आजीव सदस्यांना टपाल विभागाच्या स्पीड पोस्टने पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, असे मसापच्या निवडणूक मंडळाने मंगळवारी (दि. 3) प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.
निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक मतपत्रिकेवर विशेष क्यूआर कोड, वॉटरमार्क टाकण्यात आला असून, मतपत्रिकेच्या मागील बाजूस मतदानासाठी विशेष सूचना आणि नियमावली छापण्यात आली आहे.
मसापच्या घटनेनुसार स्वीकृत अंतिम मतदारयाद्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच क्यूआर कोड सुरक्षित पाकिटातूनच या मतदारपत्रिका पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली.
मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातीलच एक भाग म्हणून मतदारांना मतपत्रिका पाठविण्याच्या प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात होणार असून, निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाय करण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती ॲड. परदेशी यांच्यासह सह निवडणूक अधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी दिली. अत्यंत पारदर्शकपणे आणि काटेकोरपणे निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत, असेही ॲड. परदेशी यांनी सांगितले.
योग्यप्रकारे सीलबंद असलेले पाकीटच ग््रााह्य धरणार
मतदारांनी सर्व सूचनांचे पालन करून निवडणूक मंडळाने बारकोडसह पाठविलेल्या पाकिटातूनच ही मतपत्रिका टपाल विभागाच्या नियमानुसार योग्य टपाल तिकीट लावूनच निवडणूक मंडळाकडे परत पाठविणे आवश्यक आहे. योग्यप्रकारे सीलबंद करून आणि सोबत स्वसाक्षांकित आधार कार्ड किंवा पॅन कार्डची प्रत मतपत्रिकेसोबत जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा, ती मतपत्रिका बाद ठरविण्यात येईल, असे सह निवडणूक अधिकारी संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी स्पष्ट केले.
गैरप्रकार टाळण्यासाठी हे उपाय
प्रत्येक मतपत्रिकेवर विशेष क्यूआर कोड, वॉटरमार्क
मतपत्रिकेच्या मागील बाजूस मतदानासाठी विशेष सूचना आणि नियम
बारकोडसह पाठविलेल्या पाकिटातूनच मतपत्रिका पाठविणे बंधनकारक
योग्य टपाल तिकीट लावलेले पाकीटच निवडणूक मंडळाकडे परत पाठविणे आवश्यक
पाकीट योग्य प्रकारे सीलबंद असावे
सोबत स्वसाक्षांकित आधार कार्ड किंवा पॅन कार्डची प्रत मतपत्रिकेसोबत जोडणे अनिवार्य