

पुणे: राज्यात पावसाचे असमान वितरण आणखी ठळक झाले असून, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील ३५५ पैकी ८ तालुक्यांत सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. त्यातही नंदुरबार जिल्ह्यातील ४, कोल्हापूरमधील २, तर नाशिक व अहिल्यानगरमधील प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे.
एकूण १९० तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी ५४ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. तसेच १६५ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. राज्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. मात्र, पावसाचे प्रमाण समान नसल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, सरासरीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला एकही तालुका नाही.
मात्र, राज्यातील निम्म्याहून अधिक तालुके अद्याप सरासरी पावसाच्या खाली आहेत. ३१ जुलैपर्यंत राज्यातील १७५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी आणि १८० तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होता. तर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या (दि.७) आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यांची संख्या १५ ने वाढून १९० झाली. तर, सरासरी ओलांडलेल्या तालुक्यांची संख्या १८० वरून १६५ पर्यंत कमी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व अक्राणी, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व राधानगरी या आठ तालुक्यांत सरासरीच्या २५ ते ५० टक्के पावसाची नोंद आहे. सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ५४ आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ७, चंद्रपूरमधील ७, सोलापूर आणि नागपूरमधील प्रत्येकी ६, अमरावतीमधील ५ तालुक्यांचा समावेश आहे.
१२८ तालुक्यांत सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस
दरम्यान, १२८ तालुक्यांत सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील पाऊस सरासरीच्या जवळ असला, तरी अद्याप त्याने सरासरी गाठलेली नाही. कोकणातील काही तालुक्यांसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुके या वर्गवारीत आहेत.
या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांनी ओलांडली सरासरी
ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील प्रत्येकी १३, नाशिक व नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी ११ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.