

पुणे: यंदा जून महिन्याच्या दहा दिवसांत राज्यात तब्बल ४५, तर देशात सरासरी २६ टक्के इतकी तूट नोंदली गेली आहे. एरवी ही तूट १० ते १५ टक्के इतकीच असते. दरम्यान, तीन दिवसांपासून मान्सून सोलापूर ते बारामती या भागातच अडखळला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने १ ते १० जून या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील सर्वंच राज्यांतील पावसाच्या तुटीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी देशात एकूण २६ टक्के तूट जाहीर केली आहे. तर, महाराष्ट्रात ४५ टक्के तूट नोंदली गेली आहे.
पुढील दोन आठवड्यांचा अंदाज
(१२ ते १८ जून ) या आठवड्यात
नैर्ऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागांचा समावेश आहे.
( १९ ते २४ जून) : या आठवड्यात मान्सून गती घेईल, देशाच्या बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. खासकरून महाराष्ट्रात जोर चांगला राहू शकतो.
सध्या नेमकी स्थिती काय?
विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात 'एल निनो' स्थिती निर्माण होण्याचे संकेत सुरू झाले आहेत.
हिंदी महासागरावर 'इंडियन ओशन डायपोल' तटस्थ (आयओडी) स्थिती आहे. ती काही दिवसांत सकारात्मक झाली, तर देशात अन् महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल.
मान्सून हंगामाच्या शेवटी स्थिती चांगली होत आहे. तेव्हा म्हणजे सप्टेंबर अखेर अतिमुसळधार पाऊस पडेल.
मॅडन- ज्युलियन ऑसिलेशन' (एमजेओ ) निर्देशांक अंदाज कालावधीत टप्प्या- टप्प्याने कमी होणाऱ्या तीव्रतेसह पुढे सरकण्याची शक्यता आहे.