![तुमच्या छातीवर बसून मंदिर केलं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2Fdevendra-fadnvis.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ? असे काही जण विचारत आहेत. हे तेच आहेत, जे मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे, असे म्हणत होते. त्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या छाताडावर बसून मंदिर बनवले, तारीखही सांगितली. हिंमत असेल तर 22 जानेवारीला अयोध्येत या, श्रीराम मंदिर काय आहे, ते तुम्हाला दाखवू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना टोला लगावला.
फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांना संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या अटल संस्कृती गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी महापौर आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, अटलजींना अर्थकारणाची चांगली जाण होती. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. त्यांनी खर्या अर्थाने नवभारताची सुरुवात केली. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार ज्या उंचीचा लोकांना मिळाला पाहिजे ते लोक याठिकाणी बसले आहेत. प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमाणसात रुजविण्याचे आणि नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले आहे. सृष्टीतल्या लय आणि नादाची अनुभूती सामान्य माणसाला करून देणारा प्रभा अत्रे यांचा स्वर आहे. अटलजींनी इथेनॉलचे महत्त्व सर्वप्रथम ओळखले आणि सर्वप्रथम भारताचे इथेनॉल, बायोफ्युएल धोरण तयार केले. या धोरणाची खर्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योगाने केले. त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
अटलजींची स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारली…
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा तुमच्या किमान समान कार्यक्रमात राम मंदिर आणि कलम 370 चा समावेश का नाही, असे विरोधक डिवचण्याच्या हेतूने विचारत. परंतु, हा 22 पक्षांच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. माझ्या पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल तेव्हा राम मंदिरही बनेल आणि कलम 370 ही रद्द होईल, असे अटलजी सांगत. द्रष्ट्या अटलजींची ही स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारली आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा