

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत, मात्र, आपल्याकडे तेल कंपन्यांकडून अद्यापपर्यंत दर कमी करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे भारतासह राज्यातही इंधनाचे दर कमी व्हावेत, या मागणीसाठी वाहतूकदारांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी, महागाई वाढली आहे. याच्या झळा मध्यमवर्गीयांसह सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांना बसत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून इंधनाच्या दर कमी करावेत, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.
इंधन हा वाहतूकदारांसाठी महत्त्वाचा घटक आहे. इंधनाचा दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या दरात देखील वाढ होत आहे. इंधनाचे दर कमी व्हावेत, या मागणीसाठी आम्ही पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे.
– बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली/ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना