

मंचर : पुढारी वृत्तसेवा : सर्वांचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात धनुष्यबाण किंवा घड्याळावर निवडणूक लढायची, याचा निर्णय दोन दिवसांत जागावाटपात होईल. मात्र, तुम्ही निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 'महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत होणार आहे. यात शिरूरची जागा कोणी लढायची, याचा निर्णय होईल. मात्र, तुम्ही निवडणूक लढण्याची तयारी करा,' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याने आढळराव हेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील, या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. मात्र, जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने राखल्यास आढळराव यांना पक्ष बदलण्याची गरज पडणार नाही. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून खा. डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी निश्चित मानून प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढतीची शक्यता आहे.
हेही वाचा