

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : लोणी (ता. आंबेगाव) येथील डोंगरभाग शिवडीवस्तीच्या रानात गुरुवारी (दि. 10) सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास बाळासाहेब वाळुंज यांच्या रानात चरत असणार्या जर्शी गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. त्यामुळे वाळुंज यांना 1 लाख रुपयांचा फटका बसला.
वाळुंज नेहमीप्रमाणे आपल्या गायी रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते. दिवसभर गायी चरल्यानंतर सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास ते गायींना घरी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला करून गायीला ठार केले. त्यांनी आरडाओरडा केला; परंतु तोपर्यंत गायीचा मृत्यू झाला होता.
यासंदर्भात योगेश वाळुंज यांनी वन विभागाला कळविले. लागलीच वनपाल साईमाला गिते, वनमजूर बाळासाहेब लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी सरपंच सावळेराम नाईक, माऊली क्षीरसागर, ज्योती लंके, जगन लंके, कैलास लंके यांनीही घटनास्थळी भेट दिली. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाळुंजनगर, वडगावपीर व लोणी असे सलग तीन दिवस बिबट्याने शेळी व गायीवर हल्ला केल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी माजी सरपंच सावळेराम नाईक यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. वाढत्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलावीत, असे नाईक यांनी सांगितले.