नानगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड व शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रावरील ठिकठिकाणच्या बंधार्यांवर नुकतेच ढापे टाकून पाणी आडविण्यात आले आहे. मात्र, काही बंधार्यांची सध्याची परिस्थिती पाहिली, तर खराब असलेले ढापे आणि बंधार्यांच्या भिंतीला पडलेल्या भेगांमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत आहेत. भीमा नदीपात्रावरील बंधार्यांमुळे नदीकाठच्या दौंड व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे हे बंधारे शेतकर्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. बंधार्यांमुळे नदीपात्रात उन्हाळ्यात देखील पाणीसाठा उपलब्ध होऊन काही भागांत उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला जातो. मात्र, सध्या काही बंधार्यांची परिस्थिती खूपच बिकट झाल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. बंधार्याचे लोखंडी ढापे गंजलेले व त्यांना छिद्र पडलेली आहेत. तर, काही ठिकाणी जुने ढापे वापरले जात असून, त्यावर पाण्याचा मोठा दाब येतो. त्यामुळे ढाप्यांखालून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपूर्वी या बंधार्यांची बांधणी झालेली आहे. काही बंधार्यांच्या भिंतींवर झाडे उगवून मुळ्या भिंतीत गेल्याने भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे या भेगांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. यंदा सर्वत्र पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने दुष्काळाच्या झळा लवकरच जाणवू लागल्या आहेत. जर बंधार्यात आडविलेले पाणी अशा प्रकारे वाया जाणार असेल, तर पाणी अडवूनदेखील काय उपयोग होत असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. येणार्या काळात पाण्याचे बाष्पीभवन, उपसा आणि गळती यामुळेदेखील बंधार्यांच्या भागातदेखील लवकरच पाण्याचे संकट निर्माण होणार असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.