

पुणे: राज्यातील पायाभूत प्रकल्पांच्या सुविधेसाठी लीडरशिप आणि ओनरशिप अतिशय गरजेची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेच्या (मित्र) वतीने आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासंदर्भात आयोजित दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. (Latest Pune News)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘देशात 2019 मध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात जेवढे प्रकल्प सुरू होते, त्यापैकी महाराष्ट्र 49 टक्के प्रकल्पांचे काम सुरू होते. परंतु, त्यापैकी सुमारे 40 टक्के प्रकल्प रखडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे काम हाती घेताना सर्व विभागांचे योग्य नियोजन केले पाहिजे.
परिणामी, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतील. प्रकल्प गतीने मार्गी लावण्यात पहिला नंबर असला पाहिजे. रेल्वे, उड्डाणपूल, बोगदे , मेट्रो यांसारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे आपला अनुभव समृद्ध आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचे नियोजन केले पाहिजे, मात्र त्याबाबत विचार होत नाही.
त्यामुळेच प्रकल्प राखडतात, पूर्वतयारी अचूक केली, तर प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा मार्गी लागू शकतात. त्यासाठी अत्याधुनिक टूल उपलब्ध आहेत. त्याचबरोबरच निविदा प्रक्रिया आणि त्यांनतर ठेकेदार कंपनीबरोबरच जे करारनामे केले जातात, त्यामध्ये अनेक त्रुटी असतात.
कोणी राजकीय व्यक्ती अथवा अन्य कोणीही दबाव आणून निविदेतील अटी-शर्ती हव्या तशा टाकतात. त्यातून अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढतो, आणि प्रकल्पही वेळेत पूर्ण होत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिडे यांनी केले, तर परदेशी यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सादरीकरण केले.
... तरच एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होईल!
जलजीवन मिशन, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग हे प्रकल्प कसे रखडले असे त्यांनी सांगितले. लीडरशिप आणिओनरशिप घ्या. कामाची गुणवत्ता राखण्यासाठी प्रकल्प सुरू असताना लक्ष ठेवा. निविदा काढून काम दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली, असे न करता ठेकेदाराला वेळेत बिले अदा करा, तरच महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पायाभूत प्रकल्प हे विकसित असलेल्या राज्याच्या वाटचालीत महत्त्वाचे पाऊल आहे. विकसित राज्याच्या विकासद़ृष्टीचे आणि धोरणाचे साक्षीदार आहेत. विकसित महाराष्ट्र ही एक चळवळ असून, पायाभूत सुविधा विकास हा त्यातील केंद्रीय घटक आहे. त्यामुळे रस्ते, पूल, बंदरे, ऊर्जा प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प असे अनेक पायाभूत प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी उच्च क्षमतेने काम करावे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री