शिरूर; पुढारी वृत्तसेवा : रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत किसान क्रांती पॅनेलचे एकमेव विजयी झालेले संचालक दादा-पाटील यांनी आमदार अशोक पवार यांच्या बालेकिल्ल्यात घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला जास्त मतदान झाले असून, शिरूर तालुक्यातील 39 गावे जी आंबेगाव विधानसभेला जोडली गेली, त्यांनी जास्त मताधिक्य दिल्याने अशोक पवार यांच्या पॅनेलचा विजय झाल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभूमीवर आता या 39 गावांतील नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसला शिरूरच्या राजकारणात दखल घ्यावी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिरूर तालुक्यातील या 39 गावांमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी या निवडणुकीत धुरा साभांळली होती. या निकालानंतर या 39 गावांतील नेतृत्वाला दुर्लक्षित करता येणार नाही, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. आगामी शिरूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत या भागातील नेतृत्वाला विचारत घ्यावे लागणार आहे. भविष्यातील शिरूर तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये या भागातील नेतृत्वाला संधी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विचार करावा लागेल.
2009 पासून शिरूर तालुक्यातील 39 गावे आंबेगाव विधानसभेला जोडली गेल्याने शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हा भाग राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिला. शिरूर तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये ही गावे येत असली, तरी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. रांजणगाव गणपती, कारेगाव औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली गेली. वळसे पाटील यांच्या विकासकामांच्या जोरावर विरोधकांना त्यांनी चितपट केले.
घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर- आंबेगावचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केलेला नियोजनबध्द प्रचार, योग्य यंत्रणा, विजयासाठी घेतलेली मेहनत, पॅनेलच्या प्रत्येक उमेदवारासाठी मतदान, या अनेक गोष्टींमुळे या भागातून निर्णायक आघाडी घेऊन विजय संपादन करण्यात आला. त्यामुळे भविष्यात शिरूरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या भागाचे वर्चस्व राहील, असा जाणकारांचा होरा आहे.