प्रमोद गिरी :
मांजरी : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे भुयारी मार्ग नुकताच प्रवासासाठी खुला करण्यात आला. मात्र, या मार्गात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची सोय नाही. यामुळे या मार्गात सध्या मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साठले आहे. यामुळे पादचार्यांना या मार्गातून प्रवास करता येत नाही. परिणामी, त्यांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' अशी झाली आहे. दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मांजरी बुद्रुक येथे होत असलेल्या उड्डाणपुलाखाली रेल्वे भुयारी मार्ग सुरू केला आहे. सुरुवातीला या मार्गाचा मुख्य उद्देश पादचार्यांच्या सोयीसाठी होता. हा भुयारी मार्ग पादचार्यांबरोबरच दुचाकी वाहनांसाठी देखील खुला ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
त्यानुसार प्रशासनाने पदाचारी व दुचाकींना या मार्गातून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी या मार्गात पावसाचे पाणी व माती वाहून आल्याने येथून पादचारी तर सोडाच, दुचाकीचालकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे. या भुयारी मार्गात वाहने घसरून पडत असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. रेल्वेने भुयारी मार्गाचे काम केले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र हा भुयारी मार्ग आपल्या खात्याकडील नाही, अशी समजूत करून तेथून होणार्या वाहतुकीकडे दुर्लक्ष केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उड्डाणपुलाच्या अपुर्या कामामुळे पुलाच्या जोडामधून पावसाचे पाणी भुयारी मार्गात येत आहे. सर्व्हिस रस्ते मातीचे असल्याने भुयारी मार्गात राडारोडा व गाळ साचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे जोड झाकून टाकणे, सेवारस्ते डांबरीकरण करणे, भुयारी मार्गाच्या तोंडावर चर काढून देणे, अशी कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे राजेंद्र साळवे बाबासाहेब शिंगोटे, गणेश जगताप, अशोक सुनीता आव्हाळे, पूनम गायकवाड, प्रवीण रणदिवे यांनी सांगितले.
पंपाने पाणी उपसूनही प्रश्न सुटेना
रेल्वे विभागाच्या कंत्राटदाराने भुयारी मार्गातील पाणी पंपाद्वारे उपसण्याचे काम केले. बादलीने गाळ देखील काढला. मात्र, एवढे करूनही हा प्रश्न अद्याप सुटला नाही. परिणामी, नागरिकांना या मार्गाचा वापर करणे अवघड झाले आहे.