

खडकवासला: पानशेत, मोसे-मुठा खोऱ्यातील संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत अवघ्या महिनाभरात क्षमतेच्या दीडपट म्हणजे जवळपास ४३ टीएमसी पाणी जमा झाले. त्यातील १७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
साखळीची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. गुरुवारीसायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत ८ हजार ७७७ क्युसेकने पाणी सोडले जात होते.
जून महिना कोरडा गेल्याने धरणसाखळीत अल्प पाणी होते. ४ जुलै रोजी धरणसाखळीत ४.६८ टीएमसी पाणी होते. मात्र, जुलै महिन्यात धरणक्षेत्रात धो-धो पाऊस कोसळला. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले की, महिनाभरात धरणसाखळीत ४३ टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली.
त्यातील १२.३३ टीएमसी पाणी खडकवासलातून मुठा नदीत सोडले. शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी मुठा कालव्यातून अडीच टीएमसी व बंदिस्त जलवाहिन्यांतून दीड टीएमसी पाणी सोडण्यात आले.
अल निनोमुळे यंदा पावसाचे कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुलैपासून घाटमाथ्यावर पाऊस सक्रिय झाला.
त्यामुळे सध्या पानशेतमधून ३ हजार ७९६, वरसगावमधून ३ हजार ५७७ व टेमघरमधून १ हजार १६० क्युसेक पाणी सोडले जात आहे. गुरुवारी दिवसभरात टेमघर येथे १४, वरसगाव येथे १३, पानशेत येथे १४ आणि खडकवासला येथे ४ मिमी पाऊस पडला.