

खडकवासला: धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी ओढ्या-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीतील पाणीपातळी 12.84 टीएमसी म्हणजे 44.04 टक्क्यांवर गेली. पुणे शहर व जिल्ह्याला आठ महिने पिण्याचे पाणी पुरेल इतका साठा साखळीत झाला आहे.
गेल्या 24 तासांत धरणसाखळीत 0.44 टीएमसी पाण्याची वाढ झाली. बुधवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 12.40 टीएमसी पाणी होते. (Latest Pune News)
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, प्रथमच जून महिन्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 26 जून रोजी धरणसाखळीत केवळ 3.53 टीएमसी पाणी होते. धरणक्षेत्रात सध्या पावसाळी वातावरण असल्याने चांगल्या पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी दिवसभरात टेमघर येथे 12, वरसगाव येथे 3 व पानशेत येथे 4 मिलिमीटर इतका पाऊस पडला. खडकवासला येथे पावसाची नोंद झाली नाही. रायगड जिल्ह्याच्या हद्दीसह पानशेत, मोसे, मुठा खोर्यात रिमझिम सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत 1 हजार 730 व मुठा कालव्यात 352 क्सुसेकने पाणी सोडले जात आहे.