

Ketan Agarwal Murder Case: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं असतं तर या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उदयपूरमध्ये केतन आणि सिया यांचा शाही विवाह संपन्न झाला असता. सगळ्या पाहुण्यांचा गरडा त्यांच्या भोवती असता शाही महाल सजला असता. लग्नाचे स्पेशल फोटाशूट झालं असतं. मित्रांच्या नातेवाईकांच्या मोबाईल अन् इन्स्टावर केतन अन् सियाच दिले असते. मात्र लोहगडच्या ट्रेकनंतर हे सगळंच चित्र पालटलं.
केतनचा कथित दरीत ढकलून खून झाला. त्याच्या आरोपाखाली होणारी पत्नी सिया अन् तिचा कथित बॉयफ्रेंड चेतन दोघेही आता जेलची हवा खात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाचे लग्न हे श्रीमंत उद्योगपती कुटुंबात होणार होते. दुसऱ्या बाजूला ती चेतन चौधरीच्या सतत संपर्कात होती. गेल्या सहा महिन्यात या चेनत आणि सिया यांच्यात २००४ वेळा फोनकॉल्स झाले आहेत. त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांसोबत गप्पा मारल्या आहेत.
तिकडं श्रीमंत केतन अग्रवाल हा पुण्यातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबाशी जोडलेला होता. केतन हा त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायात डायरेक्टर आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर होता. अग्रवाल कुटुंबीय हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होतं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार केतन आणि सिया यांचा विवाह नोव्हेंबर महिन्यात होणार होता. त्याची भव्य तयारी देखील सुरू होती. उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं प्लॅनिंग होतं. सियाच्या वाढदिवसादिवशी देखील केतनने चांगलाच खर्च केला होता. मात्र सियाच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन चौधरीचे कुटुंबीय हे पुण्यात व्यवसाय करतात. चेतन बीबीएचे शिक्षण घेत होता. मात्र त्याला बीबीए पूर्ण करता आलं नाही. चेतन चौधरीचे कुटुंबीय हे काही मोठ्या उद्योग समुहाशी संबंधित नव्हते. त्यांची शहरात दुकाने आहेत. चेतनची आर्थिक बाजू कशी होती हे सध्या पोलीस तपासत आहेत.
मात्र सियाला नेमकं काय हवं होतं याची सध्या चर्चा जोर धरू लागली आहे. इकडं पैशाची गंगा वाहणाऱ्या घरात ती सून म्हणून जाणार होती. मात्र दुसरीकडं सिया सतत सामान्य पार्श्वभूमी असलेल्या चेतनच्या संपर्कात होती. हा नेमका प्रकार काय आहे याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ फेब्रुवारी रोजी दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली होती. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी साखरपुडा (रोका) आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सिया फक्त अग्रवाल कुटुंबीयांची होणारी सून नाही तर ती त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाली होती. ती अनेकवेळा त्यांच्या घरी गेली. होळीच्या कार्यक्रमात सामील झाली. धार्मिक कार्यक्रमात देखील तिचा सहभाग असायचा. त्यामुळं कुटुंबीयांना तिच्या वागण्यावरून कोणताच संशय आला नाही. त्यामुळं जो काही प्रकार लोहगड झाला त्यामुळं कुटुंबीय धक्क्यात आहेत.