पुणे : कलिंगड, खरबूज, चिक्कू, पेरू महागले
पुणे; पुढारी वृत्तसेवा: पावसाच्या तडाख्यामुळे फळांच्या बागांचे नुकसान झाल्याने बाजारात बहुतांश फळांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगड, खरबुजाच्या भावात किलोमागे 4 ते 5 रुपये तर चिक्कू, पेरू व डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी दरवाढ झाली. मागणीअभावी पेरूचे भाव दहा टक्क्यांनी उतरल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे हलक्या प्रतीचे डाळिंब मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. सद्यस्थितीत अवघा 20 टक्के माल दर्जेदार असून त्याला चांगले दर मिळत आहे.
हिमाचल प्रदेश येथील सफरचंदाचा हंगाम संपल्याने येथून तुरळक आवक बाजारात होत आहे. बाजारात कच्चे लिंबू दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने 15 किलोंच्या गोणीमागे भावात 200 रुपयांनी घसरण झाली. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने फळांचे भाव टिकून आहेत.
रविवारी (दि. 2) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, संत्री 25 ते 30 टन, मोसंबी 70 ते 80 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे सुमारे 1 हजार 500 ते 2 हजार, पेरू 500 ते 700 के्रटस्, कलिंगड 10 ते 12 गाड्या, खरबूज 3 ते 4 गाड्या, सफरचंद 10 ते 12 गाड्या तर सीताफळाची 20 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 200-500, अननस : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 130-250, (4 डझन) : 40-120, संत्रा : (10 किलो) : 200-500, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 40-200, गणेश : 10-50, आरक्ता 10-60. कलिंगड : 10-30, खरबूज : 10-35, पपई : 5-20, पेरू (20 किलो) : 300-500, चिक्कू (10 किलो) : 100-800, सफरचंद : हिमाचल (20 किलो) : 1200-2500, काश्मीर डेलिशिअस (17 ते 18 किलो) : 700-1000, सीताफळ : 20-120.