

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील जुना पुणे-नाशिक महामार्गावरील घोडनदीवरील ऐतिहासिक पूल आज 100 वर्षांनंतर अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी वड, पिंपळ, लिंब यांसारखी झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या मजबुतीवरच धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या झाडांची तातडीने तोडणी करून पूल सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.(Latest Pune News)
कळंब स्मशानभूमीच्या दिशेने असलेले लोखंडी संरक्षक कठडे तुटल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अंड्यांचा ट्रक या ठिकाणी कठड्याला धडकून उलटला. सुदैवाने मोठी हानी टळली, मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सन 1920 मध्ये बांधलेला हा पूल आजही वापरात आहे. मात्र, कालांतराने झालेल्या झिजेमुळे व देखभालीअभावी पुलाची स्थिती गंभीर झाली आहे. पुलाच्या डाव्या बाजूचा रस्ता खचल्याने प्रवाशांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, सरपंच उषा कानडे आणि उपसरपंच कमलेश वर्पे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, झाडे-झुडपे काढून टाकावीत व नवीन कठडे बसवावेत, अशी मागणी केली आहे. कळंब, लौकी, महाळुंगे व परिसरातील नागरिकांनीही या ऐतिहासिक पुलाचे जतन करण्यासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. कळंब पुलावरून जाताना आता भीती वाटते. लोखंडी कठडे तुटले, रस्ता खचला असून प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते, अशी शक्यता कळंबचे माजी उपसरपंच गोकुळ भालेराव यांनी वर्तवली आहे.