पाटस(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : जिरायती भागात व कमी पाण्यावर भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी कुसेगाव ची ओळख होती. मात्र, 1978 साली वीज व 1990 साली पाण्याच्या उपलब्धतेमुळे हळूहळू भाजीपाल्याची ओळख पुसली जाऊ लागली व ऊसशेतीकडे शेतकरी वळू लागला. तीस वर्षांनंतर व कोरोना साथीनंतर पुन्हा शेतकरी भाजीपाला पिके घेऊ लागल्याने पुन्हा एकदा 'माळव्याचे कुसेगाव' अशी कुसेगावची ओळख होऊ लागली आहे.
जिरायती भागात असल्याने कुसेगाव येथे पूर्वी पाण्याची कमतरता असल्याने या परिसरातील शेतकरी भाजीपाला पिके घेत होते, नंतरच्या काळात मात्र पाण्याची सोय होऊ लागल्याने शेतकर्यांचा कल उसाकडे वाढू लागला. भाजीपाला पिकापासून शेतकरी दूर गेला होता. आता शेतकरी पुन्हा भाजीपाला पिकाकडे वळल्याने 'माळव्याचे कुसेगाव' ही ओळख पुन्हा निर्माण होईल, असे चित्र परिसरातील भाजीपाल्याची शेते पाहून निर्माण होऊ लागले आहे.
कुसेगावमध्ये 1990 सालापर्यंत कमी पाण्यावर नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिके घेतली जात असल्याने वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, काकडी, लिंबू, भोपाळा, कारले ही पिके घेतली जात. गावातील प्रत्येक शेतकरी एकतरी भाजीपाल्याचे पीक घेत असे. 1978 साली गावात विजेची सोय झाल्याने काही शेतकरी पाण्यासाठी विद्युत उपकरणे वापरू लागले. 1990 च्या काळानंतर वरवंड येथील तलावावरून पाण्याची शाश्वत सोय होऊ लागल्याने येथील शेतकरी हळूहळू उसाचे पीक घेण्याकडे वळू लागल्याने भाजीपाला घेणारा शेतकरी वर्ग कमी झाला व 'माळव्याचे कुसेगाव' ही ओळख संपुष्टात आली.