

पुणे: जातीय जनगणनेबाबत काँग्रेसकडून सध्या अपप्रचार केला जात आहे. आम्ही जेव्हा काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होतो, त्या वेळी कधीही जातनिहाय जनगणना करण्याचे धाडस काँग्रेसने दाखविले नाही.
सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे सत्ता असतानाही जातनिहाय जनगणना का केली नाही? ही गणना व्हावी, यासाठी किती वेळा चर्चा झाली? असा सवाल करत काँग्रेसनेच जाणीवपूर्वक जनगणना होऊ दिली नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. (Latest Pune News)
जेव्हा जातीय जनगणनेचा मुद्दा आला तेव्हा सायंटिफिक डेटा नाही, असे कारण पुढे करत ही गणना टाळण्यात आली, असेदेखील पटेल म्हणाले. पुण्यात मंगळवारी (दि. 10) राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. मेळाव्यात पटेल बोलत होते. या वेळी त्यांनी वरील टीका केली.
पटेल म्हणाले, 2014 पासून एनडीएत सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न होता. आपली काँग्रेससोबत युती होती, ती युती आपण तोडली. भाजप- सेनेची युती देखील तुटली. आपण अडीच वर्षांपूर्वी निर्णय घेतला आणि एनडीएत सहभागी झालो.
आज आपण एनडीएचे घटकपक्ष झालो असलो, तरी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही. आम्ही अमित शहा, नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्या वेळी देखील हेच त्यांना सांगितले. आपण आदिवासी, दलित, ओबीसी समाजाला सोबत घेतले आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधकांनी संविधानाबाबत मोठे गैरसमज पसरविले. संविधान नष्ट होईल असा अपप्रचार केला. मात्र, तसे काहीही झाले नाही. ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे खरे पुरस्कर्ते कोणी असेल तर ते अजित पवार आहेत. लोकसभेला आपल्या कमी जागा मिळाल्या.
मात्र, लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवत विधानसभेत मोठे यश मिळवून दिले. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी लागा. जिथे युती होणार नाही तेथे स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. युती झाली नाही तरी आमच्यात फूट पडणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
माजी विधानसभा उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ म्हणाले, आजच्या मेळाव्याला जी कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे, ही दादांच्या कामाची पोचपावती आहे. त्यांच्या रोखठोकपणावर सगळे भारावून जातात. आता महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आत्तापासून तयारीला लागायला हवे.
सत्तेबाहेरील अनेक जण आमच्यासोबत येण्यासाठी प्रयत्नशील
सर्वसमावेशक हीच आपली भूमिका आहे. आम्ही आजहीआमच्या विचारधारेवर ठाम आहोत. आपण सत्तेत आहोत, याचा प्रत्येकाला फायदा होतो आहे. सत्तेबाहेर जे आहेत, ते देखील सत्तेत येण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सत्तेत होतो, म्हणून लाडक्या बहिणीला फायदा करून देऊ शकलो. या लोकांना बोलायला सोप्पं आहे की सरकारला महिलांना द्यायला पैसे नाहीत. मात्र, विरोधक केवळ अप्रचार करत आहेत. त्यांना पोटदुखी झाली आहे, असे पटेल म्हणाले.