पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत सध्या 3.57 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार हे सर्व पाणी पुणे शहरासाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याला ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्याची स्पष्टोक्ती जलसंपदा विभागाने मंगळवारी केली. दरम्यान, पालख्यांसाठी 0.5 टीएमसी पाणी खडकवासला साखळी धरणामधून सुरू करण्यात येणार आहे.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांत मिळून 3.57 टीएमसी (12.25 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार ग्रामीण भागाला आता सिंचन आवर्तन किंवा पिण्यासाठी पाणी सोडण्याचे प्रस्तावित नाही. उपलब्ध पाणीसाठ्यापैकी काही पाणी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी सोडण्यात येणार आहे. पुण्याला सुमारे तीन टीएमसी शिल्लक राहते.
शहराच्या पाण्याचे 15 जुलैपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सध्याचे उपलब्ध पाणी पाहता हे पाणी ऑगस्टपर्यंत पुरेल. पुढील काही दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होऊन पाणीसाठा झपाट्याने वाढण्याची आशा आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी दिली. त्यामुळे पुणे शहरात तूर्त पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे संकेत जलसंपदा विभागाकडून देण्यात आले.
दरम्यान, सध्या टेमघर धरणात 0.03 टीएमसी (0.70 टक्के), वरसगाव धरणात 1.22 टीएमसी (9.52 टक्के), पानशेत 1.47 टीएमसी (13.79 टक्के) आणि खडकवासला 0.86 टीएमसी (43.34 टक्के) पाणीसाठा सध्या धरणांमध्ये शिल्लक आहे. गेल्या वर्षी 25 जूनपर्यंत 4.20 टीएमसी (14.39 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 29 जून, तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे 28 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालख्या पुणे शहरात दाखल झाल्यानंतर दौंड, पाटस भागासाठी खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात पालख्यांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या माध्यमातून 0.5 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, असेही कुर्हाडे यांनी सांगितले.