

पुणे: इस्रायलशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याचा इशारा दिला आहे. जर तसे झाल्यास आशियाई देशांना होणारा तेलपुरवठा रोखला जाऊ शकतो. भारताच्या एकूण गरजेपैकी 40 टक्के तेल वाहतूक याच भागातून होत असल्याने भारतासमोरील चिंता यामुळे वाढली आहे.
अवघा 33 किलोमीटर रुंद असलेला हा जलमार्ग जगातील सर्वांत महत्त्वाच्या व्यापारी जलवाहतुकीपैकी एक आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकाही या युद्धात उतरते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Pune News)
इराण आणि इस्रायलने एकमेकांवर जोरदार हवाईहल्ले सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याचा इशारा दिला आहे. जर खरेच काही कालावधीसाठी जरी जल वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा भारतासह आशियाई देशांना फटका बसू शकतो.
काय आहे होर्मुझचे महत्त्व..?
पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्राला जोडणारा भाग म्हणजे होर्मुझ आहे. इराण आणि ओमानमधून जाणारा हा समुद्री रस्ता आहे. याशिवाय सौदी अरेबिया, इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार आणि खुद्द इराणमधून कच्च्या तेलाची आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची (एलएनजी) वाहतूक करण्यासाठी देखील याच मार्गाचा वापर केला जातो.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) म्हणण्यानुसार, या भागातून गल्फ देश जगातील 25 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करतात. दरमहा तीन हजार जहाजे या मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे काहीकाळ जरी वाहतूक विस्कळीत झाली, तरी जगभरातील तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल.
भारतासाठी कळीचा जलमार्ग
यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (ईआयए)च्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये आशिया खंडातील देशांना पुरविण्यात आलेल्या एकूण तेलापैकी 82 टक्के वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून झाली. तर, 2022 आणि 2023 मधील पहिल्या सहा महिन्यांत झालेल्या वाहतुकीतील 67 टक्के जहाजे भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाकडे रवाना झाली होती. भारताच्या एकूण आयातीतील 40 टक्के आयात होर्मुझमधून होते.
पेट्रोलियम पदार्थांचे अवलंबित्व 90 टक्क्यांवर
पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसेस सेलने (पीपीएसी) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये भारताचे कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांवरील (पेट्रोलियम, ऑईल, वंगण आणि इतर) अवलंबित्व 90 टक्क्यांवर गेले आहे. एप्रिल 2024 मध्ये 88.5 आणि 2023 मध्ये 88.6 टक्के पेट्रोलियम पदार्थ विदेशातून मागविले जात होते.
भारताकडे 74 दिवसांचा तेलसाठा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच भारताची तेल साठवणूकक्षमता 74 दिवसांची असल्याचे सांगितले होते. त्यापैकी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची क्षमता 40 ते 42 दिवसांची आहे. म्हणजे किमान अडीच महिने देशाची गरज भागवू शकेल इतका इंधनसाठा भारतात आहे.