

प्रवीण नगरे
पळसदेव: प्राणवायू उत्पत्तीचे काम निभावणार्या, निसर्गातील हिरवाईच्या फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व इतर अनेक कीटक सर्वांना परिचित आहेत. या सगळ्या कीटकांबरोबर मधमाशी हा कीटक देखील परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्यापासून आपल्याला औषधी गुणधर्म असणारा मध व मेण हे पदार्थ मिळतात. मात्र, मानवी चुकांमुळे या मधमाश्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
गेल्या दोन दशकांत शेती व्यवसायात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे मधमाशीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकांचा उल्लेख करावा लागेल. विविध प्रकारच्या कीटकनाशकांमुळे मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे परागसिंचन बाधित होऊन धान्योत्पादनावर परिणाम होतो. फळबागांवर देखील याचा विपरीत परिणाम होतो. (Latest Pune News)
मधमाश्यांची शेती व्यवसायातील महत्त्वाची भूमिका
मधमाश्यांची शारीरिक रचना परागीभवनाकरिता अनुकूल असल्यामुळे त्यांच्याद्वारे अतिशय उत्तम परागसिंचन होते, याबद्दल अद्यापही आपल्या समाजात अनभिज्ञता आहे. प्रत्येक कामकरी मधमाश्यांच्या पाठीमागील पायांना ’पोलन बास्केट’ची सुविधा असते.
या बास्केटमध्ये या मधमाश्या त्यांच्या मुख्य अन्नघटक असलेले परागकण साठवण करीत असतात. परागकण गोळा करीत असताना परागकण फुलाफुलांवर विखरून जाऊन परागीभवनाचे काम घडत असते. परागीभवन या निसर्गदत्त गुणामुळे लोकप्रिय असलेल्या मधमाश्या मानवी चुकांमुळे कमी होत चालल्या आहेत. परिणामी, शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.
मधमाश्यांना पोषक हंगाम हिवाळा व उन्हाळा
सामान्यपणे पावसाळ्यात केलेल्या पेरणीची पिके ही हिवाळ्यात फुलांवर येतात. मग मधमाश्या या काळात आपले जीवनचक्र प्रारंभ करण्यास सरसावतात. उन्हाळ्यात विशेष करून चैत्र महिन्यात बहरणार्या नानाविध पुष्पांवर गुंजन करीत जोमाने आपली पोळी साकारून वंशाभिवृद्धीच्या कामाला लागतात. जनसंख्या स्फोट, रानावनातील मानवी अतिक्रमण इत्यादी कारणांमुळे मधमाशी बाधित होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
जिल्ह्यातील आंबा उत्पादक संकटात
जिल्ह्यात आंबा बागायतदारांची संख्या लक्षणीय आहे. यंदा बरसलेल्या चांगल्या पावसामुळे आंब्याला उत्तम मोहर धरलेला होता. परंतु, परागीभवन बाधित झाल्यामुळे फलधारणा म्हणावी तेवढ्या प्रमाणात झाले नाही. फळधारणा झालेली फळे गळून पडली आहेत. मोहर पाहून सुखावलेला आंबा बागायतदारांचा या फळगळतीमुळे हिरमोड झाला आहे.
सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की, जेव्हा पृथ्वीवरील मधमाश्या नष्ट होतील तेव्हा मानवाचे अस्तित्व चार-पाच वर्षांत नष्ट होईल. म्हणजे मानव टिकून राहण्यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे. त्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच मधपाशीपालन करणे गरजेचे आहे. मधमाश्याhttps://www.youtube.com/watch?v=1OJvZ5tohBs
कमी झाल्या तर मानवी समाजाला नैसर्गिक मध उपलब्ध होणार नाही; शिवाय पीक उत्पादन घटणार आहे. उत्तम प्रतीचे धान्यही मिळणार नाही. त्यामुळे आपण वेळीच जागे होऊन मधमाश्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
- डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक