गणेश खळदकर
पुणे : 'स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न समजून घेणारी यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास विविध समस्या निर्माण होणार असून, त्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल,' अशी भावना स्पर्धा परीक्षार्थींकडून व्यक्त होत आहे.
स्पर्धा परीक्षा देणार्या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही हजार जणांनाच परीक्षेत यश मिळते. साहजिकच अपयश पदरी पडलेले काही विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. तर काही तरुण विद्रोहाचा मार्ग पत्करतील.
उच्च शिक्षण घेऊनही, सलग अभ्यास करूनही सनदी सेवेतील नोकरी न मिळालेल्या युवकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होईल आणि मग त्यांच्या नैराश्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे याची खबरदारी शासनाला घ्यावी लागणार असून स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचे आव्हान शासनासमोर निर्माण झाले आहे.
आयोगाचे दबावतंत्र कमी व्हावे…
स्पर्धा परीक्षार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलने करतात किंवा आयोगाला विविध समस्यांबाबत जाब विचारतात. परंतु अलीकडील काळात आयोग संबंधित विद्यार्थ्यांवर दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षार्थींना परीक्षेला बसण्यास अटकाव करणे, कारवाई करण्याचा इशारा देणे अशा आयोगाच्या दबावामुळे परीक्षार्थींमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे आयोगाने दबावतंत्राचा वापर करू नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
स्पर्धा परीक्षार्थींना शासनाने सनदी नोकरीसंदर्भात पारदर्शक माहिती देणे गरजेचे आहे. सनदी नोकरीव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षार्थी काय करू शकतात, याची माहिती देणारी यंत्रणा शासनाला उभी करावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शासनाला चालणार नाही.
– डॉ. अरुण अडसूळ, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग