

बावडा: इंदापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या बाजारभाव वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र, अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण कायम आहे.
सध्या बाजारात कांद्याला सरासरी एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मात्र, उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी किमान अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे आवश्यक असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी शहाजीराव कोकाटे (सराटी) यांनी सांगितले.
त्यांनी दोन एकर क्षेत्रांतील उत्पादित कांदा गेल्या तीन महिन्यांपासून घरासमोर साठवून ठेवला असून, आगामी दोन महिन्यांत दर वाढल्यासच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या बाजारभावात वर्षभर सातत्याने चढ-उतार होत असल्याने योग्य दर मिळविण्यासाठी शेतकरी साठवणुकीचा पर्याय स्वीकारतात.
मात्र, यंदा साठवणूक करूनही अपेक्षित आर्थिक लाभ होत नसल्याचे प्रगतिशील शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), शरद जगदाळे पाटील (टणू) आणि विलास ताटे देशमुख (नीरा-नरसिंहपूर) यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, आगामी काळात खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढून बाजारभाव आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचा कल उपलब्ध दराने कांदा विक्री करण्याकडे वळत असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले.