भवानीनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : तावशी येथील तावशी-लासुर्णे रस्त्यावरील पुलाला मोठ्या नळ्या बसवून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या तावशी ते लासुर्णे रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्यावरील तावशी येथील हा पूल आहे. या पुलाचे काम गेले अनेक वर्षांपूर्वी झालेले असून, या पुलासाठी एक फूट व्यासाच्या नळ्या पाणी जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या आहेत. या ओढ्याला भवानीनगर-सपकळवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरपासून पावसाळ्यात पाणी येते. त्या वेळी या ठिकाणी पुलाच्या नळ्यांमधून पाणी बसत नाही.
त्यामुळे पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा फुगवटा निर्माण होतो, तसेच पुलामधून पावसाचे पाणी बसत नसल्यामुळे पुलावरून पाणी वाहते व वाहतुकीसाठी हा रस्ता ठप्प होतो. या पुलालगत शेतकर्यांची भुसार तसेच उसाची पिके असून, या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्यानंतर बर्याच दिवसांपर्यंत पाणी शेतकर्यांच्या शेतामध्ये साचून राहते. त्या वेळी शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होते. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची उंची वाढविण्यासाठी व पुलामध्ये मोठ्या नळ्या टाकण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी येथील इंदापूर अर्बन बँकेचे संचालक लालासाहेब सपकळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.