पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटले असल्याने आवकही घटली आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. तसेच लसूण आणि बिन्समध्ये दरवाढ कायम असून, कांद्याचे दर घटल्याने रविवारी घाऊक भावाने 100 रुपयांत दहा किलो कांदा बाजारात विकला जात होता.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी येथील किरकोळ बाजारात कोथिंबीर 30 रूपये, मेथी 20 रूपये, पालक 20 रूपये तर पुदिना जुडी 15 रूपये दराने विक्री झाली. गेल्या आठवड्यापासून लसूण 160 रूपये तर बिन्स 130 ते 140 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. आल्याचे दर 90 रूपये प्रतिकिलो होते. तर कांदा 10 ते 12 तर बटाटा 20 रूपये व टोमॅटो 25 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
मोशी उपबाजारात कांद्याची आवक 689, बटाटा 1600, टोमॅटो 425, मटार 13, भेंडी 42, आले 15 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
तसेच घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर मिरची 35, कांदा 8 ते 9, बटाटा 8, लसून 35, आले 60, टोमॅटो 6 ते 7, भेंडी 25, मटार 50 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 32,100; फळे 541 क्विंटल आणि फळ भाज्यांची 2431 क्विंटल एवढी आवक झाली.
बिन्सच्या दरात उन्हाळा संपेपर्यंत दरवाढ कायम असेल तर लसणाच्या दरातही वाढ कायम राहील. उन्हाळ्यात महिला वर्ग मसाले बनवण्यास प्राधान्य देत असल्याने मसाल्यांच्या पदार्थांमध्येदेखील वाढ झाली आहे.
– सुनील गायकवाड, विक्रेता, पिंपरी.