वेल्हे: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगररांगापर्यंत पसरलेल्या पानशेत-सिंहगड परिसरात चितळ, रानगव्यासह दुर्मीळ वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळेच पानशेत, वरसगाव धरण खोरे परिसरात वन्यप्राण्यांची शिकार करणार्यांचा वावर वाढला आहे. वनसफारी, पर्यटनाच्या नावाखाली अनेक समाजकंटक कुत्री, बंदूक, पिस्तूल घेऊन वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जंगलातील वन्यप्राणी, वन्यजीव खाद्य तसेच पाण्यासाठी जंगलातील अधिवास क्षेत्र सोडून नागरी वस्त्यांत येत आहेत. पानशेतजवळील आंबी (ता. हवेली) येथे येथे पूर्ण वाढ झालेले नर जातीचे एक चितळ वास्तव्यास आहे. त्यांच्या अंगावर चांदेरी ठिपके आहेत. (Latest Pune News)
दिवसभर जंगलात रमणारे चितळ कळप सोडून गेल्या चार ते पाच दिवसांपासून शंकर निवंगुणे, तानाजी निवंगुणे व बबनराव निवंगुणे यांच्या आमराईत रात्री मुक्कामी असते. सकाळ होताच ते रानात निघून जाते. रानात गाई-वासरांच्या कळपात चितळ चरत असते. गोठ्यातील जनावरांची दावी चितळाने शिंगाने तोडली आहेत, त्यामुळे त्याच्या शिगांत दावी अडकली आहेत.
यासह खानू चांदर येथील रानात मागील 15 दिवसांपासून एक धष्टपुष्ट रानगवा तळ देऊन आहे. याशिवाय घोल, कुर्डुवाडी, दापसरे, तव, धामण ओहोळ आदी ठिकाणच्या रानात हरिण, रान कोंबडे, मोर, लांडोर आदी वन्यजीवांचा मुक्त संचार सुरू आहे.
जंगलात वणव्यामुळे चारा नष्ट झाल्यामुळे खाद्य व पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे, त्यामुळे चितळ आमराईत येऊन तेथे खाद्य खाऊन पाणी पित आहे. त्याला गाई-वासरांचा लळा लागला आहे.
- शंकरराव निवंगुणे, शेतकरी, आंबी
पावसाळी वातावरणामुळे जंगलातील वन्यप्राणी, पक्षी वन्यजीव बागडण्यासाठी भटकंती करत आहेत. अनेक प्राण्यांचा हा प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे कळप सोडून नर व मादी एकत्रितपणे संचार करीत आहेत. वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी सुधारित वन्यजीव सुरक्षा अधिनियम कायद्यानुसार शिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जंगलात गस्ती सुरू करण्यात आल्या आहेत, तसेच सुरक्षारक्षक, वनरक्षक, कर्मचारी तैनात केले आहेत. शिकारीची माहिती देणार्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.
- स्मिता अर्जुने, वन परिमंडळ अधिकारी, पानशेत वन विभाग