पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील २४ तासांत राज्यांतील कोकण विभागाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई आणि ठाण्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे, असे देखील भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ तासांत राज्यातील कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढेल, असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (रविवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रेड अलर्टनुसार, कोकणात मुसळधार पाऊस पडला. रायगडमध्येही पावसाची धुमशान सुरू आहे. मात्र, यलो अलर्ट असूनही मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाच्या दमदार सरी बरसल्या. रविवारपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यलो अलर्ट असूनही मुंबई आणि पालघरमध्ये सरींवर सरी बरसू शकतात.
हवामानाच्या परिस्थितीबद्दल, आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणतात, "मान्सून आजपासून दक्षिणेकडे खाली सरकत आहे. त्यामुळे किनारी कर्नाटक, केरळ, कोकण गोव्यासाठी येत्या काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करत आहोत. दरम्यान या भागांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये देखील हलका पाऊस पडेल. दिल्लीसाठी कोणताही इशारा नाही, असेही नरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.