पुणे : शेतकर्याच्या तांदळाला चांगला भाव मिळावा, यासाठी मार्केट यार्डात आयोजित केलेल्या इंद्रायणी तांदूळ महोत्सवास पुणेकरांचा प्रतिसाद लाभला आहे. एका महिन्यात तब्बल 55 टन तांदळाची विक्री झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मावळ अॅग्रो यांनी बाजार समितीच्या सहकार्यातून महोत्सवाचे आयोजन केले आहे. मार्केट यार्डातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यासमोरील ट्रक पार्किंगमध्ये हा महोत्सव सुरू आहे.
हमीभाव 20.60 रुपये असताना 24 रुपयांनी शेतकर्यांकडून या महोत्सवासाठी साळी खरेदी केली आहे. तांदळाची मागणी वाढल्यामुळे आता साळीच्या भावातही वाढ झाली आहे. सध्या 55 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या तांदळाच्या भावात 25 जानेवारीपासून 2 ते 4 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे खवय्यांनी आवश्यतेनुसार तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन मावळ अॅग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी केले आहे.