मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा: शिरूरच्या पूर्व भागातील भीमा व घोड नदीला पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील शेतकर्यांचे विद्युत पंप अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी (दि. 17) मध्यरात्रीच्या सुमारास भीमा नदीला मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रातून पाणी सोडण्यात आले होते. तसेच, डिंभे धरणातून घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
त्यामुळे अचानक रात्रीत नदीपात्रात पाण्याची वाढ झाली. त्यामुळे शेतकर्यांना विद्युत पंप पाण्याबाहेर काढता आले नाहीत. धरणक्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत सध्या वाढ होत आहे. काही शेतकर्यांनी भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास नदीकाठावर जाऊन विद्युत पंप काढले, तर काही शेतकर्यांनी विद्युत पंप काढले, पण सुरक्षित जागेत न ठेवल्यामुळे ते पुन्हा पाण्याखाली गेल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
मांडवगण फराटा-वडगाव रासाई या ठिकाणी पूल असल्यामुळे परिसरातील नागरिक खास सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत होते. भीमा नदीच्या पात्रामध्ये असलेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. या परिसरामध्ये म्हणावा असा जोरदार पाऊस झाला नाही. मात्र, भीमा नदी आणि घोड नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर या परिसरातील दोन्ही नद्या पाण्याने भरून तुडुंब वाहत आहेत. घोड नदीपात्रात पिंपळसुटी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. प्रथमच घोड नदीपात्रात सलग पाणी राहत असल्याने अनेक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.