अवसरी खुर्दसाठी नळयोजना राबवा ; गावकर्‍यांची एकमुखी मागणी

अवसरी खुर्दसाठी नळयोजना राबवा ; गावकर्‍यांची एकमुखी मागणी

मंचर : पुढारी वृत्तसेवा: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गावाला बाराही महिने दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी घोड नदीवरून चार किलोमीटर अंतरावरून लोखंडी जलवाहिनीद्वारे पाणी योजना झाल्यास कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी घोड नदीवरून नळयोजना राबवावी, या मागणीने जोर धरला आहे. अवसरी खुर्द गावात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जलजीवन मिशन योजनेंतर्गत 6 कोटी 50 लाख रुपये खर्च करून विहीर पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे.

परंतु, गावठाण व वाडी-वस्तीवरील नळ पाणीपुरवठा योजना पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गावाला पाणीपुरवठा करणारा मोरदरा पाझर तलाव पावसाअभावी आटत चालल्याने गेल्या एक महिन्यापासून गावठाणात चार दिवसांनी नळाला अर्धा तास पाणी येत असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोरदरा पाझर तलावात पाणी कमी झाल्यानंतर गावचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) उजवा कालव्यालगत एक विहीर घेऊन दोन जलवाहिनी करून मोरदरा पाझर तलावात पाणी सोडण्याचे नियोजन दहा वर्षांपूर्वी केले आहे; परंतु मार्च, एप्रिल, मे महिन्यात डिंभे उजवा कालवा पाण्याने भरून वाहत असताना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोरदरा पाझर तलावात पाणी न सोडल्याने गेल्या एक महिन्यापासून गावाला चार दिवसांनी नळाला अर्धा तास पाणी येत आहे.

सद्य:स्थितीत हुतात्मा बाबू गेनू सागर 93 टक्के भरल्याने उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे. परंतु, दोन्ही जलवाहिनीला गळती असल्याने आतासुद्धा मोरदरा पाझर तलावात पाणी सोडण्यात उशीर झाला आहे. त्यामुळेच अवसरी खुर्द गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी महिलावर्गाकडून होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news