पळसदेव: जिल्हाधिकारी कार्यालयाने उजनी जलाशयातील बेकायदेशीर मासेमारी करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, कारवाईच होत नसल्याने उजनी जलाशयातून वडापच्या साह्याने बेकायदा मासेमारी सुरूच आहे. त्यात लहान मासळी मोठ्या प्रमाणात सापडत आहे. यात परराज्यातील नागरिकांसोबत स्थानिक मच्छीमारदेखील सहभागी झाले आहेत.
उजनीत लहान वडाप जाळीच्या साह्याने मासेमारी जोरात सुरू आहे. अशाप्रकारे मासेमारी करणार्यांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने अधिक नफा मिळवण्यासाठी परप्रांतीयांसोबत स्थानिक मच्छीमारदेखील वडाप जाळीच्या साह्याने मासेमारी करताना पाहावयास मिळत आहेत. (Latest Pune News)
वडाप जाळीच्या साह्याने मासेमारी करणारे मच्छीमार व अधिकारी यांच्यात झालेल्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे नोटिसा देणे किंवा त्यांना समज देणे याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशाला जलसंपदा विभागाने केराची टोपली दाखवली आहे.
समिती ठरली कुचकामी
उजनी जलाशयातील मत्स्यबीजांचे संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर मासेमारीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडण्यात आलेली समिती देखील कुचकामी ठरली आहे. बेकायदा मासेमारी करणार्यांना लगाम लावण्याऐवजी या समितीतील अधिकार्यांना व विशेषतः जलसंपदा विभागातील कुचकामी अधिकार्यांना लगाम लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची अवश्यकता असल्याचे संतापजनक मत येथील स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी जलाशयात शासन स्तरावरून मदत करून मत्स्यबीज सोडण्यात आले. यामुळे उजनी जलाशयातील मासेमारी व्यवसायाला नवसंजीवनी प्राप्त झाली. सुशिक्षित बेकार तरुणांच्या हाताला काम मिळाले. या मत्स्यबीजांचे संरक्षण हा मोठा काळजीचा विषय बनला आहे.
लहान लहान मत्स्यबीज वडाप जाळीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात पकडले जात आहे. प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. बेकायदेशीर मासेमारीमुळे सध्या नदीकाठावर वाद-विवाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.