पुणे; पुढारी वृत्तसेवा : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्तीवेळी चालूस्थितीतील कारखान्याच्या गोदामात 2 लाख क्विंटल साखर आणि 6 कोटींचा कच्चा माल होता. अशा स्थितीत गेल्या 11 वर्षांपासून साखर कारखाना बंद का, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनावर तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत. सहकारमंत्री अतुल सावे यांना शेट्टींनी 29 नोव्हेंबर 2022 रोजी यशवंत साखर कारखान्याची निवडणूक घेण्यासह अन्य प्रश्नांवर निवेदन दिले होते.
त्यावर मंत्रालयातून साखर आयुक्तालयास कार्यवाहीच्या सूचना आल्यानंतर साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर यांनी पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांना शेट्टी यांच्या निवेदनास अनुसरून वस्तुस्थितीदर्शक अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह त्वरित देण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या शनिवारी (दि.11) यशवंत साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्या पत्रावरील साखर सह संचालकांचे येणार्या उत्तरास महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेट्टी यांनी सहकारमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की यशवंत सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त केला, तेव्हा कारखाना चालू स्थितीत होता. कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होता, कारखान्याच्या गोदामात 2 लाख क्विंटल साखर साठा होता, गोदामात 6 कोटी रुपयांचा कच्चा माल होता, संस्थेची 30 हजार लिटर मद्यार्क निर्मिती करणारी डिस्टलरी आहे.
248 एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे, असे असताना कारखाना मागील 11 वर्षे बंद आहे. तसेच, विविध लोकांकडून कारखान्यास 20 कोटी रुपये येणे बाकी असताना रक्कम वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. तरी सभासदांची अद्ययावत यादी करून संस्थेची त्वरित निवडणूक घेण्यासाठी सहकारमंत्र्यांनी सूचना दयाव्यात, अशी विनंती पत्रान्वये केली होती. त्यास अनुसरूनच कारखान्याच्या होणार्या विशेष सभेकडे हवेली तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांचे लक्ष लागले आहे.