बावडा(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर कडक ऊन व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी, असे विषम हवामान पडत आहे. विषम हवामानाने नागरिक हैराण झाले आहेत. ताप, खोकला, सर्दी अशा संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहेत. परिणामी, दवाखाने व औषध दुकानांत रुग्णांची गर्दी होत आहे. सध्या उन्हाळ्यातील मार्च महिना चालू आहे. गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला होता.
त्या वेळी तिन्ही हंगामांचा अनुभव नागरिकांना एकाच दिवशी झाला. सध्या दिवसा कडक ऊन व रात्री थंडी, अशा विषम हवामानामुळे संसर्गजन्य ताप, अंगदुखी, खोकला, सर्दी, अशक्तपणा, जुलाब आदी अनेक विकार वाढले आहेत. औषधोपचार घेऊनही आठवडाभर खोकला, ताप कायम राहत असल्याचे दिसून येत आहे. विषम हवामानाचा शेतातील भाजीपाला पिके, द्राक्षबागा तसेच पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होत आहे, असे प्रगतशील शेतकरी अमरदीप काळकुटे (रेडणी), काशिनाथ अनपट (लाखेवाडी), गणेश अनपट (भोडणी) यांनी सांगितले.
लहान मुले, वयस्क माणसांनी अतिथंड, तेलकट, अतितिखट आहार टाळावा. हात स्वच्छ धुवावेत. मात्र, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
सतिव, डॉ. सत्यम कदम, बावडा