

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : एचआयव्हीचे निदान, उपचार याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ विविध पातळ्यांवर अभ्यास करत आहेत. यामध्ये सेल थेरपी, इम्युन मॉड्यलेटर्स, एचआयव्ही अँटिबॉडीज, इम्युनोथेरपी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. भविष्यात मशॉक आणि किलफ, मब्लॉक आणि लॉकफ प्रणाली, इम्युनोथेरपीचा वापर अशा माध्यमांतून एचआयव्हीवर मात करणे शक्य होऊ शकते, असा आशावाद नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शीला गोडबोले यांनी मपुढारीफला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
प्रश्न : नारी संस्थेमध्ये एचआयव्हीबाबत कोणत्या स्तरावर संशोधन सुरू आहे ?
उत्तर : नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट सध्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साहाय्याने एचआयव्ही बरा करण्याच्या दिशेने काम करत आहे. एचआयव्ही संसर्ग हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे आणि यावर अद्याप कोणताही उपचार उपलब्ध नाही. मात्र, अँटी-रेट्रोव्हायरल (एआरटी) उपचारपद्धतीच्या साहाय्याने बाधित रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. एआरटी उपचारपद्धती सक्रिय विषाणूंवर प्रभावीपणे काम करते. मात्र, काही पेशींमध्ये विषाणू निष्क्रिय अवस्थेत आढळतो. उपचारात व्यत्यय आल्यास सुप्त विषाणू सक्रिय होतो आणि आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. निष्क्रिय विषाणू नष्ट करण्याचा मार्ग शोधणे हे सध्या शास्त्रज्ञांसमोर आव्हान आहे.
प्रश्न : एचआयव्हीसाठी आजवर कोणते उपचार परिणामकारक ठरले आहेत? उपचारपध्दतींबाबत कोणता अभ्यास प्रगतिपथावर आहे ?
उत्तर : आजवर हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्याच रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट अर्थात अस्थिमज्जा
प्रत्यारोपणाद्वारे बरे करण्यात यश आले आहे. तथापि, ही उपचारपद्धती सर्व रुग्णांसाठी शक्य आणि व्यवहार्य नाही. त्यामुळेच सध्या शास्त्रज्ञ मशॉक अँड किलफ प्रणालीच्या साहाय्याने विशिष्ट औषधे वापरून निष्क्रिय विषाणू सक्रिय करणे आणि त्यानंतर तो नष्ट करणे, तसेच मब्लॉक अँड लॉकफ पध्दतीअंतर्गत विषाणूला कायमचे शांत करणे, अशा विविध कार्यपद्धतींवर काम करत आहेत.
प्रश्न : एड्ससाठी नवीन उपचार कोणते आहेत ?
उत्तर : गेल्या दोन दशकांमध्ये परवडणारी, अधिक प्रभावी आणि कमी विषारी अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या उपलब्धतेमुळे एचआयव्ही-संबंधित मृत्यूदरात झपाट्याने घट झाली आहे. एआरटी औषधांमुळे एचआयव्ही बरा होत नसला, तरी विषाणूंची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपयोग होत आहे. रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, क्षयरोगासारख्या संसर्गाची वारंवारता कमी होते, जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि दीर्घायुष्य वाढते. सध्या एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व रुग्णांना तातडीने अँटीरेट्रोव्हायरल उपचार सुरू केले जातात.
प्रश्न : एचआयव्ही रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल झाले आहेत का ?
उत्तर : रुग्णांमध्ये औषधांचे दुष्परिणाम कमी करणे, गोळ्यांचे प्रमाण घटवणे आणि उपचारांची परिणामकारकता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अँटी-रेट्रोव्हायरल औषधे केव्हा सुरू करावीत यावरील मार्गदर्शक तत्त्वे एआरटी लवकर आणि जलद सुरू करण्याच्या दिशेने अनेक वर्षांपासून विकसित झाली आहेत. एचआयव्हीची लागण झाली आहे अशा सर्वांवर उपचार करण्याची शिफारस 2017 पासून राष्ट्रीय कार्यक्रमात आहे.