पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. याच मतदारसंघात 1991 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांचा पराभव झाला होता. आता 31 वर्षांनी पुन्हा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचेच उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, याच मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागण्याची घटना दुसर्यांदा घडली आहे. 1991 मध्ये अण्णा जोशी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना पुढे लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यातही ते विजयी झाले. त्यामुळे कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक लागली.
त्यात भाजपने त्यावेळचे नगरसेवक गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या दहापैकी 5 नगरसेवक अचानक फुटले. त्यामुळे बापट यांचा पराभव झाला. तर थोरात विजयी झाले. त्यानंतर गेली सलग 28 वर्षे या मतदारसंघातून भाजपचा उमेदवारी विजयी होत आला.
मात्र, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ विधानसभेची निवडणूक लागली. त्यात टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देणे अपेक्षित असताना भाजपने रासने यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत धंगेकरांनी दणदणीत विजय मिळवित पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची किमया पुन्हा घडविली.