वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, सिंहगडसह मुठा खोर्यात रविवारी (दि. 11) दुपारी साडेचारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या 856 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. धरणसाखळीतील धरणे भरल्याने पावसाच्या प्रमाणानुसार जादा पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी साडेचार वाजेपासून खडकवासला साखळीतील चारही धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पानशेतमधून वीजनिर्मिती सांडव्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आधीच धरणे 100 टक्के भरल्याने जादा पाणी सोडण्यासाठी कर्मचार्यांची पुन्हा धावपळ सुरू झाली.
आज दिवसभरात टेमघर वगळता खडकवासला, पानशेत भागात तुरळक प्रमाणात पाऊस होता. सकाळपासून कडक ऊन पडले होते. डोंगरी पट्ट्यात तुरळक पाऊस पडला. त्यामुळे दुपारी साडेअकरा वाजता खडकवासलातून मुठा कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु, आता तो सुरू करण्यात आला. तोरणा, राजगड खोर्यातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तोरणा गडाच्या पायथ्याच्या धानेप येथील गुंजवणी धरणातून वीजनिर्मिती सांडव्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. मुठा कालव्यात 150 क्युसेक पाणी सोडले जात होते. मात्र, सायंकाळनंतर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पानशेत, खडकवासलातून जादा पाणी सोडले जात आहे. पावसामुळे पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा त्या प्रमाणात खडकवासलातून जादा पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
– योगेश भंडलकर उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभागगुंजवणी धरणात दुपारी चार वाजता 98.76 टक्के पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे जादा पाणी वीजनिर्मिती सांडव्यातून सोडण्यात येत आहे.
– दिगंबर डुबल
कार्यकारी अभियंता, निरा देवघर , जलसंपदा विभाग
रविवारअखेर पाणीसाठा :
धरणक्षमता सध्याचा साठा टक्केवारी
खडकवासला 1.97 टीएमसी 1.97 टीएमसी 100
वरसगाव 12.82 टीएमसी 12.82 टीएमसी 100
पानशेत 10.65 टीएमसी 10.65 टीएमसी 100
टेमघर 3.71 टीएमसी 3.64 टीएमसी 98.18