पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : अस्थमासारखा श्वसनाचा असाध्य आजार असताना त्यांनी गेल्या एप्रिल महिन्यात शंभरावा किल्ला सर केला आहे. सांगवीतील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नितीन कदम यांनी आपल्या या दुर्गभ्रमंतीच्या छंदामुळे अस्थमासारख्या असाध्य आजारावर मात केली. गड किल्ल्याची भ्रमंती छंद म्हणून जोपासणारे आणि नागरिकांना छत्रपती शिवरायांच्या गड, किल्ल्यांविषयी प्रेरित करण्याचे प्रबोधनात्मक कार्य सांगवीतील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाचे (वाणिज्य विभाग) माजी प्राध्यापक अॅड. नितीन शामराव कदम हे बर्याच वर्षांपासून करत आहे.
1998 साली अस्थमा या आजाराचे त्यांना निदान झाले. डॉक्टरांनी त्यांना अवजड कामे आणि दमछाक करणारा व्यायाम न करण्याचा सल्ला दिला. आरोग्य विचार करत सुरुवातीला झेपेल इतकं चालणं, योगाचा प्रारंभ केला. त्यानंतर कदम यांनी मित्र मंडळींबरोबर पहिला प्रतापगड सर केला. पुढे दुर्दम्य शक्तीच्या जोरावर गड भ्रमंती करण्यासाठी कदम यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कालांतराने आरोग्यात सुधारणा होत गेली पुढे अस्थमाची औषधे बंद झाली.
नितीन कदम यांनी सुरुवातीला मल्हार गड, पुरंदर, तुंग तिकोना सारखे गड पादाक्रांत केले. त्यानंतर राजगड, सिंहगड,तोरणा, केंजळ गड, रायरेश्वर ,लोहगड, चावांड, कोराइसारखे अनेक गड पादाक्रांत केले. आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील डीएड दुर्गभ्रमंती ग्रुप 2018 साली तर, बीएड सहकारी वर्गाचा मिळून 12 डिसेंबर 2021 सालीद दुर्ग भ्रमती ग्रुप तयार केला. सोशल मीडियाच्या व्हॉटसअप ग्रुप माध्यमातून सर्व वयोगटातील शिक्षकाना गड भ्रमंतीला प्रेरित करून गड किल्ल्याची भ्रमंती सुरू केली. 7 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र तील सर्वात उंच कळसू बाई शिखर सहकार्य सोबत पार केले. आणि शंभरावा गड 22एप्रिल 2023 तारखेला सिंहगड पार केला आहे.
एक दिवस आपल्यासाठी…
वयाच्या पन्नाशीनंतर एक दिवस आपल्यासाठी, ही संकल्पना घेऊन आम्ही सर्व दुर्गप्रेमी दर महिन्यातून एकदा एकत्र येत गडकोट मोहिमांचे आयोजन केले जाते. आजपर्यंत नितीन कदम सराची प्रेरणा घेत अनेक स्थानिक सांगवीकर तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सहकार्यांनी गड भ्रमंती छंद जोपासला आहे. यापैकी आरोग्य सुधारणा झाल्याचे सांगतात. भ्रमंतीत काहीवेळा रतन गड, पांडव गड पायवाट चुकल्याचे प्रसंग ते सांगतात. पुण्यात 29, सातारा 24, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील आगामी काळात उर्वरित गड भ्रमंती केली जाणार आहे.
जय शिवाजी म्हणत न्या, असे म्हणण्याऐवजी महाराजांचे प्रत्यक्ष कर्तृत्व अनुभवयाला गडावर जावेच लागेल. प्रत्यक्ष अनुभवाने आपला उर भरून येतो. महाराजांच्या कार्याची शौर्याची,जिद्दीची अनुभूती पुस्तकातून येत नाही. गड भ्रमंतीमुळे मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम राहते. गड कोटा ना भेट द्यावी, इतरांनादेखील प्रेरित करावे.
-नितीन कदम, माजी प्राध्यापक